पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ११- समस्त माणगांव तालुकावासीयांची ओम सिद्धी साई दिंडी कोकण सालाबादप्रमाणे यावर्षी देखील शेकडो साईभक्तांनी साई पालखी सह पदयात्रा सुमारे ४०० ते ५०० किमी पायी प्रवास करत श्री क्षेत्र शिर्डी येथे जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले. हा प्रवास सुमारे १० दिवसांचा होता. पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर स्वगृही परतताना साईभक्त शिर्डी मधून साई बाबांनी शेकडो वर्षांपूर्वी भंडारासाठी पेटविलेली धुनी घेऊन येतात आणि त्यानंतर साईभक्तांकडून सालाबादप्रमाणे चेरवली शाखेकडून साईभंडारा करण्यात येतो. या साई भंडाऱ्यात हजारो साई सेवक सहभागी झाले. हा साई भंडारा चेरवली ग्रामदैवत बापूजी मंदिर येथे संपन्न झाला. या सोहळयात सकाळी साई सच्चरीत पारायण, दुपारी सत्यना
रायण महापूजा व सायंकाळी साईभंडारा संपन्न झाला.
या उत्सवात ओम सिद्धी साई दिंडी कोकणचे शेकडो साईसेवक उपस्थित होते. यामध्ये दिंडी संस्थापक अध्यक्ष कै. अशोक वाढवळ यांच्या ठेवलेल्या शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि त्यांचा मानस व मार्गदर्शनाखाली तसेच साईचरण रज समाधान महाराज उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा साई भंडारा संपन्न होत आहे, असे मत ओम सिद्धी साई दिंडी पालखी सोहळा अध्यक्ष तथा साईसेवक खरवली ग्रामपंचायत सरपंच संतोष खडतर यांनी व्यक्त केले आहे.चेरवली येथे होणारा साई भंडारा हा उत्सव सामजिक एकता, सामजिक सलोखा आणि सर्वधर्म समभावतेचा संदेश देणारा व शिर्डी स्व स्वरूप सद्गुरू साई बाबांचा संदेश जन माणसात पोहचविण्यासाठी साई सेवकांकडून केला जाणारा खारीचा वाटा म्हणून प्रयत्न आहे असे देखील संतोष खडतर यांनी सांगितले आहे.
चेरवली येथील १० मे रोजी झालेल्या साईभंडारा कार्यक्रमात माणगाव, तळा, गोरेगाव, लोणेरे, इंदापूर, निजामपूर, कोलाड, विभागातून हजारो साईभक्त उपस्थित राहिले व भंडारा महाप्रसाद घेतला. या साई भंडारा कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनात ओम सिद्धी साई दिंडी पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र साहिल खडतर, शैलेश नामदेव खडतर, प्रशांत खडतर, सुनिल खडतर, सुजित खडतर, रोहित खडतर व सर्व खडतर भावकी तसेच ग्रामस्थ मंडळ चेरवली यांनी अथक परिश्रम घेऊन हा साई भंडारा कार्यक्रम यशस्वी केला.



































